अपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड
schedule03 Jan 26 person by visibility 166 categoryआरोग्य विभाग
वृत्तसंस्था - एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्याला 'स्टील हब' आणि क्रमांक एक बनविण्याच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या खाण क्षेत्रातील रस्ते आणि मूलभूत आरोग्य सुविधांच्या अभावी गरोदर मातांना मृत्यूशी झुंजावे लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा (२४) या नऊ महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटतील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेने 'स्टील हब' म्हणून नावारूपास येत असलेल्या जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलदंडी टोला हे गाव मुख्य रस्त्यापासून तुटलेले असल्याने तेथे प्रसूतीची कोणतीही सोय नाही. वेळेवर मदत मिळावी या आशेने आशा किरंगा १ जानेवारी रोजी आपल्या पतीसह जंगलाच्या वाटेने ६ किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी निघाल्या होत्या. मात्र, अवजडलेल्या अवस्थेत केलेल्या पायापीटमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. २ जानेवारीच्या पहाटे त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सिझेरियनचा निर्णय घेतला खरा, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोटातच बाळाचा मृत्यू झाला होता आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचीही प्राणज्योत मालवली. प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे, मृत्यूनंतरही या माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा ४० किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यू पश्चातही उदासीन सरकारी व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली,