आरोग्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याची समाधानकारक स्थिती
schedule24 Dec 25
person by
visibility 78
categoryकोल्हापूरआरोग्य विभाग
कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्ह्यात सन २०२४ व २०२५ या कालावधीत जलजन्य व कीटकजन्य साथी आजारांच्या स्थितीचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नुकताच आढाव घेतला. यामध्ये तुलनात्मक अभ्यासात २०२५ मध्ये साथींची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. जलजन्य आजारांचे उद्रेक २०२४ मध्ये १६ इतके होते, तर २०२५ मध्ये (डिसेंबर २०२५ मधील २ नवीन जलजन्य उद्रेक धरून) ८ इतके नोंदवले गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये ५० टक्के घट झाली आहे. कीटकजन्य आजारांचा उद्रेक ९ वरून ४ पर्यंत कमी झाले आहेत. स्वाईन फ्लू रुग्णसंख्या २६९ वरून १९२ इतकी कमी झाली असून कोविड-१९ रुग्णसंख्या १०६ वरून ५६ इतकी झाली आहे. २०२४ मध्ये एकूण साथी २५ होत्या. त्या २०२५ मध्ये १२ इतक्या नोंदवल्या गेल्या असून, एकूण १३ साथींची घट (सुमारे ५२ टक्के) नोंदविण्यात आली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत इतर साथी आजारांमध्येही सुधारणा दिसून येत आहे. काविळ, डेंग्यू, अतिसार, चिकुनगुनिया, झिका, कॉलरा व जपानी मेंदुज्वर या आजारांमध्ये घट झाली आहे. मात्र हिवतापामध्ये २० रुग्णांची वाढ नोंदवली गेली आहे. याबाबत अधिक दक्षता व लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मलेरिया रुग्णसंख्या ६३ इतकी नोंदवली गेली असून, या कालावधीत एकही मृत्यू झालेला नाही. सर्व रुग्णांचे उपचार राष्ट्रीय उपचार प्रोटोकॉलनुसार पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व स्त्रोतांची नियमित ओ.टी टेस्ट घेण्यात येत आहे. पाणी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तसेच ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर सुनिश्चित केला जातो. दूषित पाणी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना तात्काळ सूचना देऊन फेरतपासणी व सुधारात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीपुरवठा टँकर, स्थानिक पाणी स्त्रोत, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे यामध्ये संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत.