Breaking : bolt
गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !औषध खरेदीपासून पुरवठ्यापर्यंत पारदर्शकता असेल तर सरकारी रुग्णालयात औषधटंचाईची वेळ का यावी ?कुडाळ - सोलापूरचा इशारा, इचलकरंजीत जैव वैद्यकीय कचऱ्याचा नवा ‘खेळ’ ?एस.एस.सर्व्हिसेसला हटवून गोविंद बायो - मेडिकलला कंत्राट, ‘स्लीपिंग पार्टनर’च्या आरोपांनी इचलकरंजी हादरले !अमरावतीत पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा, मग कोल्हापूर कारवाईसाठी आधी रुग्णाचा औषधाविना जीव जाणे आवश्यक आहे का ?४२५० कोटींच्या ‘प्रगती’ला कोल्हापूरचा आरसा !कोल्हापुरात औषधांचा तुटवडा, खरेदी प्रक्रियेत त्रुटी, आरोग्य विभागातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणीआरोग्यमंत्र्यांचा राज्यात कारवाईचा धडाका, मग स्वतःच्या जिल्ह्यात औषध तुटवड्याचा खेळखंडोबा का ? जबाबदार अधिकारी मोकाट का ? की तोंड बघून कारवाई होते..?सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का !आरोग्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात औषधांचा दुष्काळ, तांत्रिक मान्यतेतील कथित त्रुटींमुळे प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला ब्रेक..?

जाहिरात

 

गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

schedule14 Sep 26 person by visibility 8 categoryमहाराष्ट्रकोल्हापूरसंपादकीय

सुशांत पोवार (संपादकीय अग्रलेख) - आज गणरायाचे आगमन झाले... घराघरांत आरत्या सुरू होतील, सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साह असेल, रस्ते सजतील, ढोल - ताशांचा निनाद होईल, काही ठिकाणी डीजे - डॉल्बीचा दणदणाटही सुरू होईल आणि त्याच वेळी महाराष्ट्रासमोर एक प्रश्न उभा राहील, आपण गणेशोत्सव साजरा करतोय की आपल्या आवाजाची ताकद सिद्ध करतोय ? हा प्रश्न केवळ डॉल्बीचा नाही, हा प्रश्न आपल्या गणेशोत्सवाच्या आत्म्याचा आहे.
            यंदा पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे या विषयाला पुन्हा मोठी चर्चा मिळाली आहे. त्यांच्या भूमिकेवर समर्थन - विरोध दोन्ही व्यक्त होत आहेत. पण व्यक्ती कोण आहे, कुठून आली, किती वर्षे पुण्यात आहे, यापलीकडे जाऊन त्यांनी उपस्थित केलेला मूलभूत प्रश्न आपण ऐकणार आहोत का, सार्वजनिक उत्सव साजरा करण्याचा अधिकार जितका महत्त्वाचा, तितकाच दुसऱ्याच्या शांततेचा अधिकारही महत्त्वाचा नाही का ? आणि इथेच गणेशोत्सव आपल्याला एक मोठा धडा शिकवतो.
            पूर्वीचा गणेशोत्सव आठवा, मंडप साधा असायचा, आरतीचा आवाज असायचा, भजन असायचे, कीर्तन असायचे, लेझीम असायची, ढोल - ताशे असायचे, सामाजिक प्रबोधन असायचे, मंडळ म्हणजे केवळ देखावा नव्हता. मंडळ म्हणजे समाजशाळा होती, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक सहभाग, एकत्रीकरण आणि सार्वजनिक विचारांचे व्यासपीठ बनवले. आज त्या उत्सवाची भव्यता वाढली, तंत्रज्ञान आले, प्रकाशयोजना आली, आधुनिक ध्वनीव्यवस्था आली. बदलाला विरोध असण्याचे कारण नाही पण प्रश्न असा आहे की तंत्रज्ञान उत्सवासाठी आले की उत्सव तंत्रज्ञानासाठी झाला ? ही रेषा कुठेतरी धूसर झाली आहे. आज काही ठिकाणी गणरायाच्या मूर्तीपेक्षा डॉल्बी किती मोठा आहे, याची चर्चा होते. मिरवणुकीतील भक्तीपेक्षा कोणत्या मंडळाचा आवाज मोठा, याची स्पर्धा होते, बाप्पाच्या दर्शनापेक्षा डेसिबलची प्रतिष्ठा मोठी झाली तर आपण नेमके काय जपतोय ?
        या अग्रलेखाचा सर्वात गंभीर मुद्दा मात्र हा आहे की गणेशोत्सवातील उत्साहात एखाद्या तरुणाने नियम मोडले, ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले, पोलिसांनी कारवाई केली, गुन्हा दाखल झाला, त्या क्षणी मित्र म्हणतील “काय झालं ? गणपतीचा उत्सव होता !” पण दहा वर्षांनी ? तोच तरुण एखाद्या नोकरीसाठी अर्ज करेल, काही सेवांमध्ये चारित्र्य पडताळणी किंवा पोलिस पडताळणी होऊ शकते, प्रलंबित गुन्हा, न्यायालयीन प्रकरण किंवा त्याबाबत केलेले प्रकटीकरण यांचा विचार संबंधित भरतीच्या नियमांनुसार होऊ शकतो. याचा अर्थ “गुन्हा दाखल झाला म्हणजे नोकरी गेलीच” असा अजिबात नाही पण मग एक प्रश्न तरुणांनी स्वतःला विचारावा ज्या गोष्टीसाठी काही तासांचा उत्साह मिळणार आहे, त्यासाठी भविष्यात स्पष्टीकरण देण्याची वेळ आली तर ? आज मित्र म्हणतील, “भाऊ, मस्त केला डीजे !” उद्या ते मित्र तुमच्या नोकरीच्या मुलाखतीत तुमच्यासोबत असतील का ? आज व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होईल, उद्या त्याच व्हिडिओकडे कोणीतरी वेगळ्या नजरेने पाहू शकते. क्षणाचा हिरो होण्यापेक्षा आयुष्यभराचा जबाबदार नागरिक होणे महत्त्वाचे नाही का ? याचा अर्थ तरुणांनी उत्सवात सहभागी होऊ नये, असा नाही उलट तरुणांनी गणेशोत्सवाचा चेहराच बदलायला हवा.
            डॉल्बीवर बंदी घालावी किंवा घालू नये, यावर समाज दोन गटांत विभागला जाऊ शकतो. पण आपण तिसरा प्रश्न विचारूया “आपल्याला एवढा मोठा आवाज नेमका कशासाठी हवा आहे ?” आरतीसाठी ? भक्तीसाठी ? की आपले मंडळ दुसऱ्यापेक्षा मोठे आहे हे दाखवण्यासाठी ? जर उत्तर शेवटचे असेल, तर समस्या डॉल्बीमध्ये नाही, समस्या आपल्या मानसिकतेत आहे. कारण आवाज वाढवण्यासाठी मशीन लागते, पण उत्सव मोठा करण्यासाठी विचार लागतो.
          ढोल - ताशा, लेझीम, झांज, हलगी, तुतारी आणि इतर पारंपरिक वाद्ये ही केवळ जुनी साधने नाहीत तर ती आपल्या सांस्कृतिक स्मृती आहेत. पुण्यात यंदाही पारंपरिक ढोल - ताशा पथकांचा सहभाग गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक वाद्यांना आधुनिक शिस्त, ताल आणि सादरीकरणाची जोड देता येते, हेही अधोरेखित झाले आहे. मग आधुनिक पिढीने डॉल्बीचा दणदणाट आणि पारंपरिक वाद्यांचा नाद यांच्यातून तिसरा मार्ग का शोधू नये ? परंपरा जपूया, पण परंपरेच्या नावाखाली नियम मोडू नका. आधुनिकता स्वीकारूया पण आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती विसरू नका.
          हा प्रश्न कदाचित विचित्र वाटेल पण विचार करा की गणेशोत्सवातील सर्वात मोठा आवाज डॉल्बीचा नसून सामाजिक संदेशाचा असायला हवा. एका मंडळाने रक्तदान केले तर त्याचा परिणाम कित्येक कुटुंबांवर होतो. एका मंडळाने आरोग्य तपासणी घेतली तर कित्येक आजार वेळेत सापडू शकतात. एका मंडळाने व्यसनमुक्तीचा संदेश दिला तर एखाद्या घराचा संसार वाचू शकतो. एका मंडळाने विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली तर एका कुटुंबाची दिशा बदलू शकते. मग अशा कामाचा आवाज किती डेसिबल असावा ? शून्य डेसिबलमध्येही त्याचा परिणाम हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो ! हा गणेशोत्सवाचा नवा अर्थ असायला हवा.
           गणपती म्हणजे बुद्धी, विवेक आणि विघ्नहर्ता मग गणरायाची पूजा करून आपण स्वतःच विवेकाला विसरायचे का ? रुग्णालयाजवळ रुग्ण आहेत, घरात वृद्ध आहेत, परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, लहान मुले आहेत, रात्रपाळी करून घरी आलेला कामगार आहे आणि आपल्याला उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मग उपाय संघर्षात नाही तर समतोलात आहे. उत्सवही हवा, भक्तीही हवी, ढोल - ताशाही हवेत, तरुणाईचाही उत्साह हवा पण कायद्याचाही सन्मान हवा.
          यंदा प्रत्येक गणेश मंडळाने स्वतःला पाच प्रश्न विचारावेत,
1) आमच्या उत्सवामुळे कोणाला त्रास होणार नाही ना ?
2) आमच्या कार्यकर्त्यांपैकी एखाद्याचे भविष्य एका क्षणाच्या चुकीमुळे धोक्यात येणार नाही ना ?
3) आमच्या मंडळाची ओळख आवाजाने होणार की सामाजिक कामाने ?
4) गणरायाच्या आगमनानंतर परिसराला काय मिळणार आहे ?
5) विसर्जनानंतर लोक आम्हाला आठवतील ते डॉल्बीमुळे की आमच्या कामामुळे ?
             या पाच प्रश्नांची उत्तरे जर प्रत्येक मंडळाने शोधली तर गणेशोत्सवाला नवी दिशा मिळू शकते. गणेशोत्सवाची स्पर्धा असावीच पण ती कोणाची ? सर्वात मोठा डीजे कोणाचा ? नको, सर्वात महागडी सजावट कोणाची ? नको, सर्वात मोठी मिरवणूक कोणाची ? नको, सर्वात चांगले सामाजिक काम कोणाचे ही स्पर्धा असू द्या ! सर्वाधिक रक्तदान कोणाचे ? सर्वाधिक विद्यार्थ्यांना मदत कोणाची ? सर्वोत्तम आरोग्य शिबिर कोणाचे ? सर्वोत्तम पर्यावरणपूरक उपक्रम कोणाचा ? सर्वाधिक व्यसनमुक्ती जनजागृती कोणाची ? मग महाराष्ट्राचा गणेशोत्सव पुन्हा एकदा देशाला दिशा देईल.
           बापट यांचा विरोध योग्य की अयोग्य, याचा निर्णय प्रत्येकाने आपल्या विवेकाने घ्यावा. त्यांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांनीही व्यक्ती विरोधाऐवजी मुद्द्यावर चर्चा करावी आणि विरोध करणाऱ्यांनीही ध्वनीप्रदूषणाचा नागरिकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम दुर्लक्षित करू नये. कारण सध्या सुरू असलेली चर्चा व्यक्तीपुरती मर्यादित राहिली तर मूळ प्रश्न पुन्हा हरवेल. गणेशोत्सव कोणाच्याही विरोधाचा उत्सव नाही, तो विवेकाचा उत्सव आहे. म्हणून यंदा बाप्पाला एक वेगळीच आरती अर्पण करूया “बाप्पा, आमच्या हातात ढोल दे, पण विवेकही दे, आमच्या उत्सवाला उत्साह दे पण संयमही दे, आमच्या मिरवणुकीला जोश दे पण कायद्याचा आदरही दे आणि सर्वात महत्त्वाचे क्षणभराच्या दणदणाटासाठी आमच्या तरुणांचे उद्याचे आयुष्य पणाला लागू देऊ नकोस !”
              कारण डॉल्बीचा आवाज काही तासांनी थांबतो... मिरवणूक काही तासांत संपते... गणपती विसर्जित होतात... पण आपल्या कृतीची जबाबदारी आणि तिचे परिणाम कधी कधी त्यापेक्षा खूप दूरपर्यंत जातात. म्हणून यंदाचा गणेशोत्सव असा असू द्या “आवाज कमी नाही, विवेक मोठा ! उत्सव कमी नाही, उन्माद कमी ! परंपरा मागे नाही, संस्कृती पुढे ! आणि बाप्पाच्या नावाने तरुणांचे भविष्य सुरक्षित !”

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes