सुशांत पोवार (कोल्हापूर) - शहरात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी रस्त्यांच्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांवर महापालिकेने कारावाईचा बडगा उगारला आहे. मात्र, बड्या ज्वेलरी मॉल समोर तसेच घड्याळ्याचे मोठे शोरूम समोरील फुटपाथवर बेशिस्त गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न कायम आहे. या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचाही धोका वाढला आहे. पण सर्वसामान्यावर जसा आज कायद्याचा वचक आहे तसा बड्या शोरूम धारकांवरसुद्धा राहिला पाहिजे नाहीतर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेतच पण यामुळे सर्वसामान्यामध्ये असणारा कारवाईचा वचक संपणार आहे.
कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि पार्किंगसाठी जागेचा अभाव असल्याने अनेक वाहने रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. मूळ शहरातील अंबाबाई मंदिर परिसर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ यासह शाहूपुरी, राजारामपुरी, कसबा बावडा परिसरात वाहन पार्किंगची समस्या गंभीर आहे. रहिवाशांनी वाहनांच्या पार्किंगची स्वत:ची सोय केलेली नाही. बहुतांश वाहने घराबाहेर रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. बागल चौक ते उमा टॉकिज चौक या मार्गावर वाहनांचे स्पेअरपार्ट विक्री, सुशोभीकरण, कोचिंगची दुकाने आहेत. पांजरपोळ परिसरातही गॅरेज आणि कोचिंगची दुकाने आहेत. यामुळे दिवसभर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा असतात. स्टेशन रोड, सुभाष रोड, उद्यमनगर, शाहूपुरी, राजारामपुरी येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची गर्दी असते. शहरातील काही मोजकी रुग्णालये वगळल्यास बहुतांश रुग्णालयांना स्वत:चे पार्किंग नाही. रुग्णालयात येणारे रुग्ण, नातेवाईक यांसह रुग्णवाहिकाही रस्त्याच्याकडेला उभ्या असतात.
वाहतुकीचे नियम सर्वांना समानच आहेत मग व्हीनस कॉर्नर चौकातील ज्वेलरी शोरूम धारकांनी फुटपाथचे पार्किंग केल्याने पादचारी यांना जीव मुठीत धरून चौकातून चालावे लागत आहे. तसेच शोरूम धारकांच्या ग्राहकांच्या कार भर चौकात सिग्नलवर रस्त्याच्या कडेलाच बेशिस्त पार्किंग असल्याने त्याकडे वाहतूक शाखा कानाडोळा करून सर्वसामान्य नागरीकांच्यावर कारवाईमध्ये वाहतूक शाखा धन्यता मानत आहे. दसरा चौकात घड्याळाचे शोरूमच्या दारातून फुटपाथ कार पार्किंगमुळे बंद असल्याने पादचारी रस्त्याने जात असल्याने काही वेळा छोटे मोठे अपघात झाले आहेत पण या बड्या शोरूमच्या दारातून वाहतूक शाखेने किती कारवाई केल्या हे पहिले तर कायदे फक्त सर्वसामान्याच्या साठीच आहेत असेच वाटायला लागले आहेत. पर राज्यातून येणारे पर्यटक यांच्यामध्ये सुद्धा महामार्ग पोलिसांची धास्ती आहे. गोवा राज्याच्या धर्तीवर कागल चेक पोस्ट येथेच गाड्यांची कागदपत्रे बघून महाराष्ट्रात प्रवेश द्यावा. कागदपत्रे अपूर्ण असलेल्या वाहनांना त्याच ठिकाणी थांबवावे. छोट्या छोट्या कारणांसाठी पर्यटकांना त्रास देणे सुरु राहिल्यास याचा सर्वात मोठा फटका पर्यटन क्षेत्रावर होणार आहे. वेळीच पोलीस अधीक्षक यांनी यामध्ये सुधारणा करून तशा सूचना वाहतूक शाखेला देऊन कोल्हापूरचा गुदमरलेला श्वास मोकळा करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.