पांढऱ्या कोटावरचा वार... कायद्याच्या राज्यावरचा प्रहार! धाक कायद्याचा की दादागिरीचा ?
schedule09 Jul 26 person by visibility 61 categoryसंपादकीय
सुशांत पोवार (अग्रलेख ) - रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटणारा डॉक्टर आज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ही केवळ एखाद्या डॉक्टराची शोकांतिका नाही हा आपल्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या विवेकाला पडलेला प्रश्न आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर शासकीय रुग्णालयात घडलेली घटना ही एका डॉक्टरवर झालेली मारहाण नसून, ती पांढऱ्या कोटावरील विश्वास, वैद्यकीय सेवेचा सन्मान आणि कायद्याच्या राज्यालाच दिलेले खुले आव्हान आहे.
एका नवजात बाळाला तातडीने NICU बेडची गरज होती. परंतु उपलब्ध बेडच नव्हते. ही वस्तुस्थिती डॉक्टरांनी निर्माण केलेली नव्हती. तरीही ऑन-ड्युटी असलेल्या डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी वैद्यकीय निकषांनुसार बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय दृष्ट्या योग्य असलेला हा निर्णय काहींना रागाचा विषय ठरला आणि डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला. प्रश्न असा आहे की, NICU बेड उपलब्ध नसण्याचा दोष डॉक्टरांचा की व्यवस्थेचा ? रुग्णालयात बेड अपुरे असतील, डॉक्टरांची संख्या कमी असेल, यंत्रसामग्री अपुरी असेल, औषधांचा तुटवडा असेल, तर त्यासाठी जबाबदार कोण ? उपचार करणारा डॉक्टर की आरोग्य व्यवस्था उभी करणारे धोरणकर्ते ? दुर्दैवाने आपल्या समाजात प्रत्येक अपयशाचे सर्वात सोपे लक्ष्य डॉक्टर बनले आहेत.
डॉक्टर हा देव नाही, पण तो माणूसही नाही का ?